Ajit Pawar Reaction On Lok Sabha Result : राज्यातील राजकीय गोंधळाच्या परिस्थितीत (Maharastra Politics) महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी चांगली कामगिरी केल्याचं पहायला मिळतंय. तर महायुतीचा मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. सर्वात मोठा सेटबॅक बसला तो राष्ट्रवादी अजित पवार गटाला... अजित पवार गटाने 5 जागेवर निवडणूक लढवली होती. त्यात फक्त रायगडच्या जागेवर त्यांना विजय मिळवता आलाय. त्यामुळे आता निराशाजनक कामगिरीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार काय म्हणाले?


लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.