अहमदनगर : श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार कांबळे यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपावला आहे. याच बरोबरीने सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट देखील घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांबळेंना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. राधाकृष्ण विखेंचे समर्थक असलेल्या कांबळेंनी विखे पाटलांच्या भाजपात जाण्याच्या हालचालू सुरु असतांनाही त्या़ची नाराजी पत्कारत लोकसभेची निवडणूक लढवली होती. 


त्यात त्यांचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. पण त्यांनी थोरात यांची साथ धरली होती. आज मात्र त्यांनी थोरात यांची साथ सोडली.आमदार कांबळे यांनी मुंबईत सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 


त्यानंतर आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, खासदार प्रताप जाधव, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते. कांबळे यांना सेनेने विधानसभेची उमेदवारी देण्याचे कबूल केली आहे. मात्र आता कांबळेंना विखेंची साथ लाभणार असल्याची चर्चा रंगत आहे.