हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आघाडी आणि युतीचा उमेदवार जाहिर झाल्यानंतर आज भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देशमुख यांनी राजगुरूनगर शहरातून वाजत गाजत जोरदार शक्ति प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून युतीला बंडखोरीचा फटका बसणार असून आता या मतदार संघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेड तालुक्यात भाजपाचे दोन जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती तर दोन नगरपरिषद अशी एक हाती सत्ता आहे. मात्र या मतदार संघातील जागा युतीत शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेकडून सुरेश गोरे यांना उमेदवारी जाहीर झाली. म्हणून भाजपाचे खेड तालुक्यात सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन विधानसभा निवडणुक मैदानात पाय रोवला आहे. या तालुक्यात तरुणांची मोठी फळी राजकारणात सक्रिय असल्याने तरुणांच्या विचाराचाच उमेदवार या मतदार संघात विजयाचा गड राखणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.



मागील पाच वर्षापासुन याठिकाणी शिवसेना आणि भाजपा यांच्या समोरासमोरच लढाई पहायला मिळाली. मात्र यामध्ये ज्यांचं या तालुक्यासाठी कुठलेही कर्तृत्व नाही त्यांनाच तिकिट दिलं जात. त्यामुळे यापुढे लोकं ते स्वीकारणार नसुन यापुढे माझा सारखा तरुण उमेदवार म्हणुन सक्षम पर्याय उभा असल्याने आजी-माजी आमदारांना लोकं यावेळी घरी पाठवणार असल्याचे भाजपातुन बंडोखोरी केलेले अतुल देशमुख यांनी सांगितले.


मला विद्यमान आमदारांना पाडण्यासाठी निवडणुक लढवायचीय असे खेड तालुक्यात माजी आमदार म्हणतात. तर विद्यमान आमदार सांगतात माझा कुणाला त्रास नाही मात्र खेड तालुक्यात हे वैभव उभं करण्यासाठी आजी-माजी आमदार बोलत नाही त्यामुळे आम्ही लोकांसमोर विकासाचे एक वेगळा पर्याय आपल्या समोर उभा केल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटीलांनी आजी-माजी आमदारांना लक्ष केलं.