श्रीकांत राऊत, झी मीडिया, अमरावती : आमदार बच्चू कडु हे आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. ते जनतेत जाऊन मिसळतात आणि गरीब, वंचितांचे प्रश्न ऐकून घेतात. व्यवस्थेत राहुनही शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करताना दिसतात. यावेळीही त्यांचा रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. तिहेरी हत्याकांडामुळे असलेल्या तणावाच्या पर्शवभूमीवर आ. बच्चू कडु यांनी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवार आपली ताकद दाखवत होता. आपल्यामागे किती कार्यकर्ते आहेत ? आपल्यावर जनतेचे किती प्रेम आहे हे रॅलीच्या गर्दीतून दाखवण्याचा प्रयत्न होता. पण या सर्वात आमदार बच्चू कडू हे वेगळे ठरले. त्यांनी रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. ज्याचे कार्यकर्त्यांनीही स्वागत केले. 


चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात दोन गटाच्या हाणामारीत तीन हत्या झाल्या. या तणावामुळे शहरात संचार बंदी लागू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत आमदार बच्चू कडू ह्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र कुठलीही रॅली आणि शक्ती प्रदर्शन न करता आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून उमेदवारी दाखल केली.