रवींद्र कांबळे, झी २४ तास, जत : २१ ऑक्टोबरला राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर २४ ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. विधानसभेच्या २८८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण राज्याचा शेवटचा म्हणजेच २८८वा मतदारसंघ असलेल्या जतने धक्कादायक निकाल दिले आहेत. असेच धक्कादायक निकाल देण्याची जतची ओळख आहे. याच मतदारसंघातून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपाचं कमळ फुललं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९५ पासून २०१४ पर्यंत नेहमी वेगळा, नवा उमेदवार निवडून देणारा जत हा मतदारसंघ आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा २००४ मध्ये भाजपाचं कमळ जतमधूनच फुललं. २००४ मध्ये भाजपाचे सुरेश खाडे, २००९ मध्ये भाजपाचे प्रकाश शेंडगे, २०१४ मध्ये भाजपा विलासराव जगताप हे निवडून आले होते.


भाजपाचे आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपाचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे.


म्हैसाळ सिंचन योजना, पाण्यावाचून तहानलेली ६५ गावं, अपुरे रस्ते आणि मुलभूत सुविधा या सुविधांच्या आजही जत प्रतीक्षेत आहे. आता या समस्या सोडवण्याबद्दल ज्याची खात्री वाटेल, त्याच्या पारड्यात जतची मतं पडणार हे मात्र निश्चित आहे.