विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पती आणि पत्नीमध्ये भांडण किंवा भांडणामुळे पती किंवा पत्नीने आत्महत्या केली अशा बातम्या आपण अनेकवेळा वाचत असतो. पण औरंगाबादमध्ये एका पतीने ज्या कारणासाठी आत्महत्या केली ते कारण ऐकून तुम्हीही डोक्यात हात मारुन घ्याल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये नुकत्याच लग्न झालेल्या एका तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने व्हॉट्सअॅपवर I QUIT असं स्टेट्स ठेऊन आत्महत्या आपलं जीवन संपवलं. अजय साबळे असं तरुणाचं नाव असून तो औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर इथं रहातो. 


आत्महत्याचं कारण काय?
अजय राजनगर भागात आपल्या आई-वडिलांसह रहात होता. प्लम्बिंगचं काम करुन तो घर चालवत होता. पाच महिन्यांपूर्वी अजयचं लग्न झालं. पण लग्नामुळे तो फारसा खुश नव्हता.  रविवारी त्याची पत्नी माहेरी गेली होती. यावेळी त्याने आपल्या मोबाईलवर I QUIT असं स्टेटस ठेवलं. हे स्टेट्स पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला, यावेळी अजयने गळफास घेतल्याचं त्याला दिसून आलं, यानंतर ही घटना उघडकीस आली. अजने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. 


सुसाईड नोटमध्ये काय?
मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर तिथे जेवणानंतर स्वत:ची जेवणाची प्लेट उचलून ठेवते, तिला स्वयंपाकही येत नाही, असा उल्लेख अजयने सुसाईड नोटमध्ये केला होता. पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून हस्ताक्षर त्याचंच आहे का हे तपासलं जात आहे.


दरम्यान, अजयने ज्या कारणासाठी आत्महत्या केली, ते कारण ऐकून परिसरात एकच चर्चा रंगली आहे.