औरंगाबाद : काल औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे आज पुन्हा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कालचीच स्थिती पाहायला मिळाली. कालही समसमान मते पडली होती. आजही तसेच नाट्य घडून आले. त्यामुळे अध्यक्ष निवडीसाठी चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला.



औरंगाबाद जिल्हा परिषदेत आज देखील रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके आणि शिवसेना बंडखोर देवयानी डोनगावकर यांना समसमान ३०-३० मते मिळालीत. त्यामुळे चिट्ठी काढून अध्यक्ष निवडण्यात आला. यात महाविकास आघाडीच्या मीना शेळके विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल. जी. गायकवाड हे निवडून आले. दरम्यान आपण ग्रामीण भागातील विकासासाठी काम करू, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्षा मीना शेळके यांनी दिली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी टर्म संपल्यानंतरही बंडखोरी करून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी काल माघार घेत डोणगावकर यांना पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीच्या मीना शेळके आणि डोणगावकर अशी थेट लढत झाली. यात दोघींनाही २९ मते मिळाली. त्यानंतर गोंधळ झाला आणि निवडणूक प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज निवडणूक झाली. यावेळीही समसमान मत पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.