Victims Grandmother on Akshay Shinde Death: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. अक्षय शिंदेने पोलीस कोठडी दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आधी समोर आली होती. दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. हा मृत्यू नसून एन्काऊंटर असल्याचा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान बदलापूर घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 
 


काय म्हणाली पीडितेची आजी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे झालं ते बरं झालं. अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हायला हवी, लोकांच्या हातात सापडला असतात तर बेदम मारलं असतं. लोकांच्या हातात सापडला असता तरी त्याचा मृत्यू झाला असता. तो लोकांच्या तावडीतच सापडायला हवा होता, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आजीने 'झी 24 तास'ला दिली. 


काय म्हणाले फडणवीस?


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर लैगिक अत्याचाराची एक तक्रार करण्यात आली होती. त्याचे वॉरंट घेऊन त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होतं. त्याने पोलिसांची बंदूक खेचून घेतली आणि फायर केलं. संरक्षणासाठी पोलिसांनी फायर केलं. यात त्याचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेले फायरिंग आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर अधिकृत माहिती येणे बाकी आहे, असे फडणवीस म्हणाले.  


विरोधकांचे आरोप 


अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून हे एन्काऊंटर असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे अशाच प्रकारे एन्काऊंटर झाले होते. खरंच ते आरोपी होते का? हे पाहिले नाही आणि फाईलच बंद करण्यात आली. आता अक्षय शिंदेच्या बाबतीतही तेच झालाय.स्वसंरक्षणाचा बनाव म्हणत एन्काऊंटर केला गेलाय. अक्षय शिंदेचा आवाज बंद करुन कोणाला वाचवलं जातंय? असा प्रश्न त्यांनी विचारला.जर अक्षय शिंदे जर हिंस्र होता, त्याने 2 राऊंड फायर केले असं म्हणतायत, तो इतका तरबेज होता तर तशी व्यवस्था का नव्हती? आपण कसाबवरदेखील खटला चालवला होता. पहिल्या दिवसांपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अक्षय शिंदेचा आवाज बंद करुन कोणाला फायदा? आपल्याकडे गुन्हेगाराला बाजू मांडायला मिळते. जे कोणी पोलीस ड्युटीवर होते, ते तात्काळ निलंबित झाले पाहिजेच. ज्यांनी ड्युटी लावली त्यांची चौकशी केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.