पुणे : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची चहुबाजून कोंडी होतानाचे चित्र सध्या दिसत आहे. 1 जानेवारीच्या शौर्यदिनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भीम आर्मीच्या 15 कार्यकर्त्यांना काल शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मालाडच्या हॉटेलसमोर घोषणाबाजी केली. या दरम्यान या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचेही वृत्त समोर आले होते.


परवानगी नाकारली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना देखील आतापर्यंत परवानगी मिळालीच नसल्याचे समोर आले आहे. भीम आर्मीतर्फे ३० डिसेंबरला कोरेगाव भीमा संघर्ष सभेचं आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आयोजित केलेल्या सभेलाही अजूनपर्यंत पोलीस परवानगी मिळालेली नाही. ३१ डिसेंबरला चंद्रशेखर आझाद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंबेडकरवादी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. मात्र विद्यापीठाकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही कार्यक्रम घेण्यावर भीम आर्मीचे स्थानिक कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे या ठिकाणी संघर्ष चिघळ्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.


यंत्रणा सज्ज 


विजय दिनाच्या निमित्तानं कोरेगाव-भीमामध्ये १० लाख लोक येतील असा अंदाज बांधला जात आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड, २००० स्वयंसेवक आणि ५२० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यासंदर्भात माहिती दिली. 


नियंत्रण कक्ष, महिती केंद्र, अग्निशमन यंत्रणा, बसेस, अँब्युलन्स तैनात राहणार आहेत. याशिवाय चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेराचा वापर होणार आहे. मोबाईल शौचालयं आणि पाण्याच्या टँकरचीही सोय कोरेगाव-भीमामध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलीय.