मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. लग्न जमत नसल्याने नैराश्यातून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने आपल्या शेतात स्वत:चं सरण रचून आत्महत्या केली. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
28 वर्षांचा महेंद्र बेलसरे हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द इथे राहात होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा. वडिलांची 3 एकर बागायती शेती आहे. तर गावातील इतर लोकांची 8 ते 10 एकर जमिनी घेऊन त्यावरही ते शेती करतात.


बुधवारी म्हणजे 16 फेब्रुवारीला गावात दोन लग्नसमारंभ असल्याने त्या तरुणाचे आई-वडिल आणि गावातले सर्व लग्नसमारंभासाठी गेले होते. कोणाचंही लक्ष नसल्याचं पहात हा तरुण आपल्या शेतात गेला. तिथे जाऊन त्याने शेतात पडलेल्या लाकडांचं सरण रचलं आणि अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच सर्वांना घटनास्थळी धाव घेतली. पण त्याआधीच महेंद्रचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून महेंद्र स्वतःचं लग्न जुळत नसल्याने नैराश्येत होता. याच नैराश्येतून त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत पोलीस त्याचा तपस करीत आहे.