Jalna Car Accident: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) अपघातांच्या घटना अद्याप सुरूच आहेत. आजही समृद्धीवर व्हॅगनआर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी दुभाजकाला धडकून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते आहे. 


कार कंटेनरला धडकली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्यातील निधोना गावाजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. कारने कंटेनरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशा चुराडा झाला आहे. कारच्या काचाही आत घुसल्या आहेत. या अपघातात तिघे ठार झाले आहेत.


मुंबईहून नागपूरकडे जाताना अपघात


अपघातात मृत्यूमुखी पडलेला एक प्रवासी हा नागपूर मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. तर उर्वरित मयत प्रवाशांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईवरुन नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला आहे. 


दरम्यान, जालन्यातील दुधाणवाडी येथेदेखील गुरुवारी अपघात झाला होता. नागपूरकडे जात असताना ट्रकचा पाठीमागील भाग तुटल्यामुळे काही वेळापूर्वी तो लेनवर उभा होता. त्याचवेळी मुंबई येथून येलदरीकडे जाणारी पिकअप बोलेरो क्रमांक एमएच ०४ एचडी ०९२९ च्या चालकाने भरधाव वेगाने येऊन ट्रकच्या पाठीमागील बाजूस जोराची धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


भंडारा जिल्ह्यात बसचा अपघात 


भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बसचा आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. या बसमध्ये ५० प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बस सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ५० प्रवासांना घेऊन तुमसर ते चंद्रपूर जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी खरबी नाका गावाजवळ पोहोचतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी चालक संजय जाधव याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर बस ही डिव्हायडरला तोडून सर्विस रोडवर उतरली. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सदर वेळी बस मध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. कोणत्याही प्रवासाला गंभीर इजा झाली नसून दूसरी बस बोलावून प्रवाशांना सुखरूप पाठविण्यात आले आहे.