कासराळी : अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्नात एकमेकांच्या गळ्यात हार घालताना त्यांनी भावी सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. नव्याने आयुष्य ती दोघंही जगण्यास सुरुवात करत होती. सगळं चांगलं होत असतानाच नियतीने असा काही खेळ मांडला की सारेच उद्ध्वस्त झाले. नियतीच्या खेळापुढे कोणाचे काय चालणार म्हणा... असेच काहीसे शिवलिग कुनके आणि कोमल यशवंतकर या जोडप्यासोबत घडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन दिवसांपूर्वीच हे दोघंही विवाहबंधनात अडकले होते. मात्र नियतीने त्यांच्या भविष्याची स्वप्ने पूर्ण करुच दिली नाहीत. नांदेड- बिलोली मार्गावरच्या कासराळी येथे झालेल्या भीषण अपघातात या जोडप्याचा मृत्यू झाला. 


जळकोट येथून हे दोघंही नांदेडच्या दिशेने निघाले होते. कासराळी येथील पेट्रोल पंपाजवळ टेम्पोने कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिवलिग आणि कोमल यांचा जागीच मृत्यू झाला. १९ एप्रिलला या दोघांचे लग्न झाले होते.  लग्नानंतर अवघ्या तीनच दिवसांत या जोडप्याचा मृत्यू झाल्याने गावात एकच शोककळा पसरलीये.