Pramod Mahajan on Shivsena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला आता एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. काल संध्याकाळी म्हणजेच 17 फेब्रुवारी 2023 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide Gets Bow and Arrow of Shivsen) यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. त्यामुळे ठाकरे गटाचा पुरता हिरमोड झालेला आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या या निकालानंतर शिंदे गटानं सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे तर ठाकरे गटानं लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हणत या निकालाविरूद्ध बंड पुकारला आहे. एकीकडे या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर शिंदे गटाला शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं काल जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपाऱ्यातून जल्लोष साजरा करण्यात आला तर दुसरीकडे ठाकरे गटानं (Thackeray Gat vs Shinde Gat) या सगळ्यांविरोधात ठिकठिकाणी आपला विरोध प्रकट केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या निर्णयानंतर सगळीकडेच आश्चर्याचे धक्के बसत आहेत. त्यानिमित्ताने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यातील असंच एक भाकित पुन्हा चर्चेत आलं आहे. दिवंगत भाजपचे नेते प्रमोद महाजन यांनी 20 वर्षांपुर्वी एक भाकित केले होते जे आज खरे ठरले आहे अशी चर्चा आता सगळीकडेच सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याचा भाकिताची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटाला वारंवार चोर असं म्हटलं आहे तर धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde vs Uddhav Thackeray) यांनी जल्लोष साजरा केला आणि सत्यमेव जयतेची घोषणा केली. 


पण ही गोष्ट आहे ती तब्बल 20 वर्षांपुर्वीची. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजनांना (Rajdeep Sardesai and Promod Mahajan) एक प्रश्न विचारला होता. हा प्रसंग होता मुंबईचे शेरीफ नाना चुडासामा यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतला. त्या पार्टीत राजदीप सरदेसाईही उपस्थित होते. त्यांनी प्रमोद महाजनांना विचारलं की, दिल्लीत तुमचा पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष आहे आणि वाजपेयींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवतही आहात पण महाराष्ट्रात उलट आहे. तुम्ही लहान भाऊ आहात तर तुमचा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना आहे. यावर प्रमोद महाजन म्हणाले होते की, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल. 


सध्याच्या सत्तासंघर्षाकडे पाहता भाजप हा महाराष्ट्रात क्रमांक एकच पक्ष झाला आहे. त्यातून गेल्या आठ वर्षांत भाजपानं भारतात शक्तिशाली पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे भाजपा-शिवसेना युतीचे शिल्पकार मानले जातात. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 2014 सा्ली पहिल्यांदाच भाजपशी असलेली शिवसेनीची युती तुटली. त्यानंतर 2019 साली शिवसेनेनं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी केली 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले. गेल्या सात महिन्यात शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सत्तासंघर्ष सुरू आहे.