COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनं केलेल्या आत्महत्येप्रकरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत शेतकी शंकर चायरे यांची मुलगी जयश्रीनं ही तक्रार दाखल केली आहे. तसेच मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. बोंडअळीची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे निराश होऊन शंकर चायरे या शेतकऱ्यानं काल आत्महत्या केली. 


माजी खासदार नाना पटोलेंची मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चायरेंनी मोदी जबाबदार असल्याचं नमूद केलं होतं. आता या प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. सामान्य माणसानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारवर पोलीस गुन्हा दाखल करतात. तर मग हे प्रकरण वेगळं कसं असू शकतं, असा प्रश्न माजी खासदार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पटोले यांनी केली आहे.