हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry death) यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) पालघर जिल्ह्यातील (Palghar News) डहाणूजवळील चारोटी जवळ भीषण अपघात झाला. या अपघताता सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला.  सायरस मिस्त्री यांचा जिथे अपघात घडला तिथेच एका वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात (Accident:) इतका भीषण होता की. कार अर्धी कापली गेली आहे. मात्र, तरीही अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी सुखरुप बचावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दैव तारी त्याला कोण मारी" अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे . मात्र, याच म्हणीची प्रचिती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर मधील धानिवरी येथे आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या अपघाती मृत्यू ठिकाणाहून काही अंतरावर धानिवरी येथे फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला. 


चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ही फॉर्च्यूनर थेट पुढे चाललेल्या कंटेनर वर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात फॉर्च्युनर गाडी अर्धी कापली गेली. तसेच या भरधाव कारने अपघातानंतर तीन ते चार पलटी देखील खाल्ल्या.  मात्र, या कार मधील कार चालकासह सहप्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ड्रायव्हरसह सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने या कार मधील कोणालाही किरकोळ दुखापत सुद्धा झाली नाही.  विमल मैतालिया हे आपल्या कारचालक आणि मुलांसह मुंबईकडे जात असताना धानीवरी येथे हा भीषण अपघात घडला. मात्र, कार मधील सर्वांचा दैव बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही.


वाहतुकीचे नियम पाळल्याने जीव वाचला


वाहतुकीचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन पोलीस प्रशासन, आरटीओ आणि शासनाकडून करण्यात येते. नियम मोडणाऱ्यांना दंडही लावला जातो. मात्र, हेच नियम जर काटेकोरपणे पाळले तर आपला जीव आपण स्वतःही वाचू शकतो हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. 


मुंबई अहमदाबाद महामार्गावर  मोठा अपघात टळला


मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे एक अनियंत्रित ट्रेलर ट्रक दुभाजकावर चढल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई हून गुजरात दिशेने जाणारा हा ट्रेलर विरार फाट्याजवळ आला असताना समोर चालणाऱ्या एका कारने अचानक ब्रेक मारला. त्या कारला आपला ट्रेलर धडकू नये म्हणून ट्रेलर चालकाने वेगावर नियंत्रण मिळवत दुभाजकाच्या दिशेने ट्रेलर वळवला असताना हा अपघात घडला. मात्र, सुदैवाने याच वेळी दोन्ही वाहिनींवर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला. या अपघातामुळे महामार्गांवरिल वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेन च्या साहाय्याने ट्रक बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली.