Maharashtra Cabinet Meeting Decision Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आज सकाळी साडेनऊ वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईचे एन्ट्री आणि एक्झीट पॉइण्ट असलेल्या पाच प्रमुख टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. आनंदनगर (ठाणे), एसबीएस (मुलुंड), दहिसर, ऐरोली आणि वाशी टोलनाक्यांवरील टोल माफ करण्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासूनच ही मागणी होती, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असून हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी नोंदवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या एकूण 19 निर्णयांची यादीच जाहीर केली आहे. नेमके कोणते निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ते पाहूयात...


मंत्रिमंडळ बैठक झालेल्या निर्णयांची यादी संक्षिप्त स्वरुपात


1. मुंबईतल्या पाचही प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्यात येत आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. (सार्वजनिक बांधकाम)


2. आगरी समाजासाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार. (सामाजिक न्याय)


3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम लागू केली जाणार. (उच्च व तंत्रशिक्षण)


4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता देण्यात आली. (जलसंपदा)


5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्यात आली. (जलसंपदा)


6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. (जलसंपदा विभाग)


7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. (महसूल)


8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी देण्याचा निर्णय झाला. (महसूल)


9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला गेला. (महसूल)


10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 राबविणार असल्याचं निश्चित झालं. 


11. पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता देण्यात आली. (नगर विकास)


12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ करण्याचा निर्णय. (सहकार)


13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला गेला. (सहकार)


14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे जाहीर केली गेली. (वैद्यकीय शिक्षण)


15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. (वैद्यकीय शिक्षण)


16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा केला जाणार. (मराठी भाषा)


17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट स्थापन केला जाणार. 


18. उमेदसाठी अभ्यासगट स्थापन केला जाणार. (ग्राम विकास)


19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. (कौशल्य विकास)