Bribe : फक्त 760 रुपयांमुळे नोकरी गेली; दारुची बाटली लाच म्हणून घेतली

सरकारी कर्मचाऱ्यांनी चक्क दारुची बाटली लाच म्हणून स्वीकारली आहे. पालघरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारीही चकित झाले आहेत (Bribe).
हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : चालखोरीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे (Maharashtra ACB) अनेक कारवाया केल्या जातात. तरी देखील लाचखोर वेगवेगळ्या पद्धतीने लाच घेत असतात. पालघर येथे वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाच म्हणून यांनी दारुची बाटली मागितली होती. या दारुच्या बाटलीची किंमत फक्त 760 रुपये आहे. अवघ्या 760 रुपयांच्या दारुच्या बाटलीमुळे यांची नोकरी गेली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दारूची बाटली लाच म्हणून घेताना वर्ग तीनच्या दोन वनपालांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालघर लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. वाडा तालुक्यातील नेहरोळी परिमंडळ आणि बाणगंगा परिमंडळ वनपालांना 760 रुपयांचा दारूची बाटली लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
ठेकेदाराला पंचनामा ना हरकत दाखला देण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपये रोख आणि एक खंब्याची लाच मागितली होती. त्यांनतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णु पोपट सांगळे आरोपी वन पालाची नावे आहेत. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या मॅनेजर कडून जमिनीच्या बिनशेती प्रकरणात वन विभागाच्या नाहरकत दाखला मिळण्याकरीता पंचनामा करण्यासाठी रुपये दहा हजार एक राॅयल स्टॅग दारूची खंबा याची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याची संपूर्ण माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. सदर कारवाई वनविभाग वाडा येथील शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा स्विकारला करण्यात आली आहे. या प्रकरणात लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, हवालदर अमित चव्हाण,विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा,पोलीस नाईक स्वाती तारवी यांनी कारवाई केली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांना 8.5 लाखाची लाच घेताना अटक
औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात कार्यकरत असलेल्या अधिकाऱ्याला आठ लाख 53 हजार ची लाच घेताना अटक करण्यात आली होती. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तसेच मुंबई महापालिका अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 लाख 50 हजारांची लाच घेताना अटक केली. मोहन राठोड असे या लाचखोर पालिका अधिकाऱ्याचे नाव आहे. राठोड एच पश्चिम विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत होता. लाचखोरी प्रकरणात राठोड याला अटक करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई न करण्याच्या बदल्यात राठोड याने 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेरीस राठोड 8 लाख 50 हजारांवर तडजोड करण्यास तयार झाला. अखेरीस 8 लाख 50 हजारांची लाच स्वीकारताना राठोड याला अटक करण्यात आली.