हातकणंगले : हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव होऊन जनतेने शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला. धैर्यशिल यांनी राजू शेट्टी यांची घरी जाऊन भेट घेत राजकारणाचा आदर्श जनतेसमोर ठेवला. पण आता हातकणंगले मतदार संघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर 459 मते ईव्हीएम मधून जादा निघाली आहेत. त्याबाबत राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हातकणंगले मतदारसंघात एकूण 12 लाख 52 हजार 211 जणांनी मतदान केले. यामध्ये स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांना 4 लाख 87 हजार 276 मतं मिळाली तर शिवसेनेच्या धैर्यशिल माने यांना 5 लाख 82 776 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 151 मतं मिळाली होती. ईव्हीएम द्वारे12 लाख 45 हजार 797 मतदान झाले तर ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांची संख्या 12 लाख 46 हजार 256 इतकी आहे. यामध्ये एकूण 459 मते जादा झाली आहेत. यामध्ये पोस्टलची मते धरलेली नाहीत.


धैर्यशिल यांना कौल 


देशपातळीवर शेतकरी नेता म्हणून ओळख असलेल्या राजू शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र हातकणंगलेच्या मतदारांनी त्यांना नाकारले. या मतदारसंघात शेतक-यांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपल्या विजयाची त्यांना खात्री होती. शिवसेनेने धैर्यशिल माने यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवून आपले डावपेच खरे ठरवले. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली होती.