Pune MPSC Girl Incident: पुण्यात दर्शना हत्याकांडाची पुर्नावृत्ती (Darshana Murder Case) टळली आहे. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेत घडला आहे. शंतनू जाधव असं आरोपीचे नाव असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, पीडित मुलीने त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. 


पुण्यातल्या सदाशिवपेठेत काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 10च्या सुमारास विद्यार्थिनी स्कुटीवरुन कॉलेजला निघाली होती. त्याचवेळी तिच्याशी बोलायच्या हेतूने आरोपी तिच्याजवळ आला. बोलत असतानाच त्यांच्यात बाचाबाची झाली आणि बॅगेतून कोयता काढून तिच्यावर वार केले. तरुणीच्या हातावर व डोक्यावर गंभीर जखम झाली आहे. 


नेमकं काय घडलं?


पीडित तरुणीची आणि आरोपी शंतनू जाधव यांची कॉलेजमध्ये असल्यापासून ओळख होती. दोघांमध्ये मैत्री होती. शंतनूचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने त्याला नकार दिला. तसंच त्याच्याशी बोलणे टाळले होते. मात्र तो सातत्याने तिला कॉलेजजवळ येऊन फोन करायचा तसंच, धमकी द्यायचा, असं पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.


म्हणून केला तरुणीवर हल्ला


'तो माझा मित्र होता. मी त्याला नकार दिला म्हणून त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कॉलेजजवळ येऊन तो मला फोन करायचा पाठलाग करायचा, असं तिने म्हटलं आहे. मी एकदिवस त्याच्या घरच्यांना त्याच्या वागण्याबद्दल सांगितले होते. त्याची तक्रार करेन असंही मी म्हटलं होतं. पण त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. मी घरच्यांकडे तक्रार केली म्हणून आज त्याने माझ्यावर वार केले,' असंही तरुणीने तक्रारीत नमूद केलं आहे. 


तरुणीने सांगितला घटनाक्रम


'आज मी कॉलेजकडे जात होते तेव्हा तो आला व पाच मिनिटे थांब असं बोलला. पण मी थांबण्यास नकार दिला तेव्हा त्याने बॅगेतून कोयता काढून माझ्यावर वार केले. माझ्या हाताला, पाठीला आणि डोक्यावर वार केले आहेत. माझा काही दोष नसताना माझ्यावर हल्ला करण्यात आला,' अशी आपबिती पीडित तरुणीने सांगितली.


महिला आयोगाकडून दखल
 
राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना याबाबत सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष देऊन आहेत. विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू. काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार या तरुणीचा अशाच प्रकरणात जीव गेला. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर असलेला तणाव, कुटुंबापासून दूर असल्याने जाणवणारा एकाकीपणा, विद्यार्थ्याचे आपापसातील संबंध या सगळ्याच विषयांबद्दल समुपदेशन होणं गरजेचं आहे. मुलीने लग्नाला किंवा प्रेमाला नकार दिल्याने हिंसेच्या वाटेने मुलांनी जाणं हे धोकादायक आहे. या सगळ्या बाबतीत त्यांचं समुपदेशन करणं काळाची गरज आहे. यासाठी शासनाने, संबंधित यंत्रणेने जागरूक होत पावलं उचलणं गरजेचं आहे, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.