पुणे : कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागलाय. काल राज्यभरात 1134 रूग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येतंय. अशाच परिस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क वापरण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राजेश टोपे म्हणाले, "राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढतायत. यामध्ये मुंबई, पालघर, पुणे आणि रायगड यांचा समावेश आहे. या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकारने एक पत्र पाठवलं आहे. तर परवा झालेल्या बैठकीत राज्याच्या टास्क फोर्सकडून स्पष्ट करण्यात आलंय की, बंदिस्त ठिकाणी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करावं, मात्र सक्ती नाही." 


राजेश टोपे पुढे म्हणाले, 10-15 दिवसांत झालेल्या रूग्णवाढीमुळे बंदिस्त ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलंय. 


दरम्यान देशात कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झालंय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. 


आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील 11 जिल्हे, तामिळनाडूतील 2 जिल्हे, महाराष्ट्रातील 6 जिल्हे, कर्नाटक आणि तेलंगणातील एका जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 


राज्यालाही केंद्र सरकारचं पत्र


मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचं केंद्राने म्हटलंय. या जिल्ह्यामंध्ये टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा, याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही निर्देश दिले गेले आहेत.