परभणी : जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं हा इशारा येत्या ४८ तासांसाठी दिला आहे. सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान या तीन जिल्ह्यांच्या काही भागात राहणार आहे. विदर्भातही १-२ ठिकाणी या दोन दिवसांत अतिउष्ण लाटेचा इशारा दिला गेलाय. येथील तापमान ४७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.


पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजेचा कडकडाट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.  तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांतील काही भागांत विजेचा कडकडाट आणि वादळी वा-यासह पाऊस कोसळू शकतो.  येत्या २४ तासांसाठी हा इशारा  हवामान विभागानं दिला आहे.


तळपता उन्हाळा, चंद्रपुरला पाणीटंचाईच्या झळा


दरम्यान,  एकुण पावसाच्या ५० टक्के कमी पर्जन्यवृष्टी झालेल्या चंद्रपूरकरांसाठी यंदाचा उन्हाळा पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने संकटाचा काळ ठरलाय. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारे इरई धरण निचांकपातळीवर आल्याने चंद्रपूरात भिषण पाणी टंचाई जाणवते आहे. मात्र मोठ्या नद्या कोरड्या पडल्याने जिल्ह्यातील इतर तालूका स्थानांची पाणी पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आता चक्क कोळसा खाणीतील पाणी नदीत सोडून पाणी पुरवठा केला जात आहे.