Congress News : महाराष्ट्र काँग्रेसमधल्या वादाची गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. त्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) मुंबईत येणार  आहेत. (Congress Disputes) बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एच.के.पाटील चर्चा करतील. मात्र नाना पटोले पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार आहेत. ( Maharashtra Political News  )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तेव्हा पटोलेंच्या गैरहजेरीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. एच. के. पाटील दुपारी हुबळीवरुन मुंबईत दाखल होतील. दुपारी 4 नंतर ते बाळासाहेब थोरातांची भेट घेतील. संध्याकाळी ते महाराष्ट्र काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाच्या तयारीचा आढावा घेतील. त्यानंतर  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठकीत चर्चा करतील. 


 विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलान. नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली. महाविकास आघाडीकडून नाशिकमधील जागा लढविण्याचे ठरले. ही जागा काँग्रेसला देण्यात आली. कारण विद्यमान आमदार हे काँग्रेसचे होते. डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा मुलगा सत्यजित तांबे याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काँग्रेसमधील वाद उफाळला. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. तर मुलाला मदत केली. या घडामोडीत काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब  थोरात गप्प असल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी अपक्ष सत्यजित तांबे विजयी झाले.  सत्यजित आता अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेत खरे. पण, ते आता पुन्हा काँग्रेसचा हात धरतील की भाजपचं कमळ हातात घेतील हे लवकरच स्पष्ट होईल.


सत्यजित यांची उमेदवारी जाहीर करण्यात काँग्रेसने अभूतपूर्व घोळ घातला. नाशिकमध्ये ते इच्छुक असताना त्यांच्या जागी त्यांच्या वडिलांना उमेदवारी देण्यात आली. तेही त्याची घोषणा नवी दिल्लीतून करण्यात आली. इतर उमेदवारांची घोषणा मात्र नाना पटोले यांनी केली. नाशिकमध्ये मात्र नाना पटोले यांनी दिल्लीतल्या त्यांच्या पाठिराख्यांना हाताशी धरल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नाना पटोले विरुद्ध तांबे आणि बाळासाहेब थोरात असे चित्र राज्यात दिसून आले. त्याचवेळी बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना तडकाफडकी गटनेतेपादाचा राजीनामा दिला. त्यामुळे हा वाद टोकाला पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये हा वाद अधिक उफाळणार याचे संकेत मिळतात, पक्षश्रेष्ठी कामाला लागलेत. पक्ष फुटू नये म्हणून आता धावाधाव सुरु झालेय.