वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : तुम्ही एटीएममध्ये गेलात आणि 500 रुपये काढण्याची कमांड दिलीत. पण तुमच्या हाती अडीच हजार रुपये आले तर? लॉटरी लागल्यासारखं वाटेल की नाही? जळगावच्या रावेरमध्ये चिनावलच्या ग्रामस्थांना खरोखरच अशी लॉटरी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिनावलच्या एसटी बसस्टँड परिसरातल्या एटीएममधून पाच पट पैसे बाहेर येत होते. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी झाली. एटीएममध्ये टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याने इंडिकॅशच्या एटीएमवर संध्याकाळी 6 ते रात्री 8.30 या वेळेत नागरिकांनी एटीएममधून तब्बल सहा लाख रुपये काढले.


याबाबत इंडिकॅश एटीएमच्या अधिकारऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत एटीएम बंद केलं.
या प्रकरणाची नोंद अद्याप पोलीसांच्या डायरीत झालेली नाही. पण सुरक्षेसाठी बँकेचे अधिकारी आणि पोलीस एटीएममध्ये तळ ठोकून आहेत.


एटीएममध्ये नोटा भरताना ब्लॉक सेटिंग चुकीचं झालं असेल किंवा मशिनच्या सेटिंगमध्ये काही बिघाड झाला असेल, अशी शक्यता लोडिंग कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. अर्थात, व्यवस्थित तपासणीनंतरच नेमकं काय घडलं ते समोर येणार. शिवाय अतिरिक्त आलेले पैसे वसूल करण्याचं आव्हानही एटीएम चालवणाऱ्या टाटा इंडिकॅश समोर आहे. मात्र सध्या तालुक्यात चर्चा आहे ती या लॉटरीवाल्या एटीएमचीच.