नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यात (Jalna news) नळाचे पाणी भरताना विद्युत मोटारीच्या वायरला स्पर्श होऊन दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन (Bhokardan) शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. भोकरदन शहरातील बालाजी मंदिराजवळ रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. नम्रता संदीप सुरडकर (16) असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप सुरडकर हे शहरातील बालाजी मंदिराजवळ राहतात. रविवारी सकाळी नळाला पाणी आल्याने त्यांनी विद्युत मोटार सुरू केली होती. त्यावेळी नम्रताही पाणी भरत होती. त्याचवेळी नम्रताचा इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरला स्पर्श होऊन तिला शॉक लागला. या घटनेनंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नम्रता ही दहावी शिकत होती. तसेच ती वर्गात हुशारही होती.


अर्धा पावसाळा उलटूनही तालुक्यात पाऊस नसल्याने सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिकेकडून आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नळाला आलेले पाणी भरण्यासाठी प्रत्येकजण घाईगडबड करत असल्याचे दिसून येत आहे. त्याच गडबडीत ही शॉक लागण्याची घटना घडली आहे.


पाणी टंचाईमुळे अर्ध्या गावाने अंघोळ करणं सोडलं


दरम्यान, पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. मराठवाड्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंतरवली गावात पाणी नसल्याने अर्धे लोकं अंघोळच करत नसल्याचे वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे.