अहमदनगर : कोपर्डी सामूहीक बलात्काराच्या घटनेचा आज एक वर्ष पूर्ण होतंय.   या घटनेचा राज्यभरातून निषेध झाला. राज्यभर मूकमोर्चे निघाले.. सरकारवर दडपण आलं.. निर्भयाच्या न्यायाच्या मागणीसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं उचल खाल्ली मात्र वर्षभरातच सारं काही थंड झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ जुलै २०१६ नंतर कोपर्डी हे गाव अचानक प्रकाशझोतात आलं. त्याला कारणही तेवढंच भयंकर होतं.. देशाला हादरवून टाकणा-या दिल्लीतल्या निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती नगर जिल्ह्याल्या कोपर्डी या लहानशा गावात घडली... एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तीची निर्घृण हत्या करण्यात आली.  आणि अवघं राज्य या घटनेनं ढवळून निघालं.


या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मूकमोर्चे काढण्यात आले. चौकशीची चक्र वेगानं फिरली आणि  मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला पोलिसांनी दुस-याच दिवशी बेड्या ठोकल्या. त्याच्या जबाबात संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेंची नावं पुढे आली.... दोघांनाही तात्काळ अटक झाली. या तीन नराधमांना न्यायालयात नेत असतानाच संतापलेल्या महिलांनी त्यांच्यावर अंडी आणि चपला फेकून मारल्या. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू झाली. 


निकमसध्या या खटल्याची सुनावणी सुरूच आहे. आणखी काही जणांच्या साक्षी नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर या खटल्याचा निकाल जाहीर होऊन आरोपींना शिक्षा सुनावली जाईलच मात्र कोपर्डीच्या या घटनेनं महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला जनक्षोभाचं वेगळंच रुप पहायला मिळालं.. कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत औरंगाबादमध्ये 9 ऑगस्टला पहिला मराठा मूक मोर्चा निघाला.. बलात्काराच्या घटनेचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निषेध होता.


कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याबरोबरच या मोर्चातून मराठा आरक्षण, शेतमालाला भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा इतर मागण्याही पुढे येऊ लागल्या. या मोर्चांमुळे सरकारवर दबाव वाढला... मात्र नंतर मराठा संघटनांमध्ये फूट पडून श्रेयवादाची लढाई सुरु झाली.. ज्या गावात ही अमानुष घटना घडली ते गाव आता रोजच्या कामांमध्ये व्यस्त झालंय. आज वर्षभरातनंतर या जखमेवरची खपली पुन्हा सळू लागलीये. कारण कायदे कितीही कठोर झाले तरी आजही बलात्काराच्या घटना काही थांबल्या नाहीत.