Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. अहिल्या यांचा जन्म 1725 मध्ये अहमदनगरमधील चौंडी गावात झाला.  गावातील आदरणीय व्यक्तीमत्व असलेल्या माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या होत्या. त्यांचा जन्म कोणत्याही राजघराण्यात झाला नव्हता. असे असतानाही एके दिवशी राज्याची सत्ता त्यांच्या हातात आली. एका सामान्य कुटुंबातील मुलगी असामान्य जबाबदाऱ्या पार पाडू लागते हे पुढच्या पिढीतल्या लाखो तरुणींसाठी प्रेरणादायी ठरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांच्या पतनाचा हा काळ होता. त्या काळात मराठे त्यांचे गेलेले साम्राज्य मिळवण्यात आणि त्याचा विस्तार करत होते. मल्हारराव होळकर हे मराठा सेनापतींपैकी एक होते. पेशवे बाजीराव यांनी माळव्याची जहागीर मल्हारराव होळकरांना दिली. होळकरांनी आपल्या बळावर राज्य स्थापन केले आणि येथे इंदूर वसवले. मल्हारराव होळकर हे आपल्या एकुलता एक मुलगा खंडेराव याच्यासाठी अशी मुलगी शोधत होते जी मुलाला गादी सांभाळण्यात मदत करू शकेल. यादरम्यानच्या काळात त्यांची अहिल्याबाईंशी भेट झाली. एका दौऱ्यादरम्यान ते चाऊंडी गावातून जात होते. तेथे  संध्याकाळच्या आरतीदरम्यान एका मुलीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. अहिल्याबाईंचे गुण आणि संस्कार पाहून ते प्रभावित झाले. आपला मुलगा खंडेराव होळकर यांचा अहिल्याशी विवाह करून दिला.


मल्हाररावांना अहिल्याबाईंच्या क्षमतेवर विश्वास


लग्नानंतर खंडेरावांनी सत्ता हाती घेतली. याच काळात अचानक झालेल्या युद्धात अहिल्याबाई यांचे पती खंडेराव होळकर यांना हौतात्म्य आले. त्यावेळी सती प्रथा होती. पण मल्हारराव होळकरांना अहिल्याबाईंच्या क्षमतेवर विश्वास होता. त्या आपल्या मुलाची जबाबदारी घेऊ शकतात हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून परावृत्त केले आणि विश्वास दिला. 


पतीच्या मृत्यूनंतर घेतलं लष्करी प्रशिक्षण 


त्यांनी अहिल्याबाईंना लेकीप्रमाणे वाढवले ​​आणि अहिल्याही मल्हाररावांना राज्याच्या कारभारात मदत करू लागल्या. अहिल्याबाईंचे जीवन संघर्षाने भरलेले होते. कारण काही काळातच त्यांनी आधी आपले  सासरे आणि नंतर 22 व्या वर्षातच त्यांचा मुलगा मालेराव गमावला. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर राज्याचा कारभा रकोसळू नये म्हणून त्या पुढे सरसावल्या. पती खंडेराव होळकर यांचे निधन झाल्यावर अहिल्याबाईंनी लष्करी शिक्षण घेतले. त्या काळात त्यांना महिला सक्षमीकरणाचे हे उदाहरण मानले जाते.


महिला सैन्याची स्थापना


अहिल्याबाईंनी स्वतः प्रशासन हाताळण्यास सुरुवात केली. अहिल्याबाईंनी राज्य मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सैन्याची स्थापना केली. अहिल्याबाईंच्या राज्यात स्त्रियांना त्यांचे हक्काचे स्थान मिळू लागले. अहिल्याबाईंनी मुलींच्या शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. निराधारांना मदत करण्याचे काम केले. यामुळे जनतेमध्ये त्यांच्याप्रती प्रचंड आदराची भावना होती. परकीय आक्रमणांपासून त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण केले. 


औरंगजेबाने पाडलेली मंदिरे पुन्हा बांधली


अहिल्याबाई होळकरांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्य केले. औरंगजेबाने नष्ट केलेली मंदिरे त्यांनी पुन्हा बांधली. श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, उडुपी, गोकर्ण, काठमांडू इत्यादी ठिकाणी त्यांनी भारतभर अनेक मंदिरे बांधली आहेत.