Maharashtra Assembly Election Sanjay Raut On BJP: "महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांत काय घडेल हे जनता ठरवेल, पण जनतेचा कल स्पष्ट दिसतो. राज्यात परिवर्तन घडेल व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असे वातावरण आहे. गद्दारी, बेइमानीच्या अग्नीतून जन्माला आलेले मिंधे-फडणवीसांचे सरकार स्वत:चे व महाराष्ट्राच्या अस्मितेचे स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून दहन करणाऱ्या भस्मासुरासारखे दहन होताना मी स्वत: पाहत आहे," असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "अमित शहा यांनी फडणवीस यांना आश्वासन दिले आहे, ‘पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच.’ फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव आताच ठरला आहे," असंही राऊत 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये म्हटलं आहे.


ठाकरे यांचे सरकार घालविण्यासाठी रेडे कापले, पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"निकाल लागायचा तेव्हा लागेल. भाजपने आपल्या गोवऱ्या आधीच सोनापुरात रचून ठेवल्या, असे म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचे अवतारकार्य अमित शहा यांनीच संपवले. अफाट पैसा व गुवाहाटीचे रेडा बळीही त्यांना वाचवणार नाहीत. हा मजकूर लिहीत असताना बातमी आली, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन मिळताच मुख्यमंत्री शिंदे हे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले व देवळाच्या मागून रेड्यांच्या करुण किंकाळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या! फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही, पण त्यांच्या नावाचा बाजार मांडणाऱ्यांनी ठाकरे यांचे सरकार घालविण्यासाठी रेडे कापले, पण अमित शहांनी निवडणुकीनंतर त्यांनीच निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील रेड्यांचा बळी घ्यायचे ठरवले आहे," असं म्हणत राऊत यांनी युती सरकावर निशाणा साधला आहे. 


पैशांचे मायबाप कोण?


"पुण्याच्या खेड-शिवापूर टोलनाक्यावर पैशाने गच्च भरलेल्या दोन गाड्या पकडल्या. या गाडीत 22 कोटी रुपये कॅश होती, पण शेवटी पोलिसांनी 5 कोटीच सापडल्याचे जाहीर केले. शिंदे गटाचे सांगोल्यातील आमदार शहाजी पाटील यांच्याशी संबंधित या गाड्या होत्या. गाडीतले लोकही त्यांचे. ते पसार झाले व 22 कोटींपैकी 5 कोटी जप्त केल्याचे दाखवून पोलिसांनी फुशारकी मारली. पैशांचे मायबाप कोण हे सांगायला पोलीस तयार नाहीत, पण राज्यातील निवडणुकीत या वेळीही पुन्हा प्रचंड पैसा उधळला जाईल, याची नोंद जनतेने घेतली आहे. भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षांकडून कोणत्याही खास अपेक्षा ठेवता येणार नाहीत हे दिसते," असंही राऊत म्हणालेत. 


नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'


भाजप कधीच सरळ मार्गाने विजयी होत नाही


"महाराष्ट्रातील निवडणुका साम, दाम, दंड, भेद अशाच पद्धतीने लढवल्या जातील. शेवटी मुंबईची सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना आपल्याच मुठीत हवी. त्यासाठी काहीही करायला ते तयार आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकांत भाजप काय करतो आहे? मतदार याद्यांत घुसून ‘बोगस’ मतदारांची लाखो नावे त्यांच्या ‘आयटी’ फौजांनी घुसवली. महाविकास आघाडीला मतदान करू शकतील अशी नावे शोधून काढणे व ती यादीतून रद्द करणे हा एकसूत्री कार्यक्रम भाजपने राबवला. त्यासाठी लोकसभेत झालेल्या मतदानाचा आधार घेतला," असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. "कोणत्या भागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान झाले त्याची छाननी करून प्रत्येक मतदारसंघातून किमान दहा हजार मतदार वगळायचे व त्या जागी बोगस आधार कार्डाच्या आधारे तेवढीच नावे घुसवायची हा राष्ट्रीय प्रकल्प भाजप महाराष्ट्र व झारखंडमध्ये राबवत आहे. या प्रकल्पातून त्यांनी शिंदे व अजित पवार गटात सुटलेले मतदारसंघ वगळले. याचा अर्थ असा की, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतानाही आपल्या साथीदारांशी दगाबाजी करायची हे धोरण काही थांबले नाही. मतदार यादीतच घोटाळे केल्यावर ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड करण्याची गरज भासणार नाही हे त्यांचे धोरण दिसते. भाजप कधीच सरळ मार्गाने विजयी होत नाही. शिंदे-पवार हे आता अमित शहांच्या ‘गुड बुक’मध्ये राहिलेले नाहीत. त्यांची गरज संपली आहे. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाच्या मदतीने शिंदे यांचे सरकार अडीच वर्षे चालवले. आता मतदार यादीच्या माध्यमातून ते घालवले जाईल हे मात्र नक्की," असंही राऊत म्हणालेत.


नक्की वाचा >> 'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले


योगी हे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जेथे गेले त्या सर्व ठिकाणी भाजपचा पराभव


"मतदार याद्या शुद्ध करण्याची चळवळ स्वयंसेवी संस्थांनी हाती घ्यावी. सिव्हिल सोसायटीने हे काम हाती घेतले पाहिजे. नाहीतर निवडणुका हा एक अमित शहांच्या हातचा खेळ बनेल. भाजप महाराष्ट्रात हिंदूंना चिथावणी देईल व मुसलमानांना आग भडकविण्यास उत्तेजन देईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर महाराष्ट्रात दंगली भडकविण्याचे विशेष कार्य आधीच सोपवले आहे. भाजपच्या हस्तकांनी व योगींच्या चमच्यांनी मुंबईभर योगींच्या फोटोसह पोस्टर झळकवले आहेत. त्यातील मथळा आहे, ‘बटेंगे तो कटेंगे!’ याचा अर्थ काय? हिंदूंनी एकजुटीत भाजपला मतदान करावे, नाहीतर मुसलमान तुम्हाला कापतील! या काटाकाटीच्या चिथावणीखोर भाषेचा कोणताही परिणाम लोकसभा निवडणुकीत झाला नाही. योगी यांची भाषणे आपटी बारही ठरली नाहीत. योगी हे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जेथे गेले त्या सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत उत्तरेच्या फौजा मुंबईत येतील. गुजरातच्या फौजा दोन महिने आधीच महाराष्ट्राच्या विधानसभा क्षेत्रात घुसल्या आहेत. महाराष्ट्र त्यांना काबीज करायचा आहे. टोळधाडीप्रमाणे ते घुसले आहेत. हे संकट टाळायला हवे," असं राऊत यांनी म्हटलं आहे.