Sadabhau Khot on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर राज्यात सध्या नवा राजकीय वाद सुरु आहे. काका विरुद्ध पुतण्या लढाईत सत्ताधारी आणि विरोधकही प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) सैतान आहेत अशा  शब्दांत टीका केली आहे. "शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे," असं ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी शब्दांत टीका केली आहे. माजी मंत्री तथा रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना सैतान म्हटलं असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती. पण आता पुतण्यापासून मला वाचवा अशी नवीन हाक आता महाराष्ट्रला ऐकू येत आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. 


सदाभाऊ खोत काय म्हणाले?


"शरद पवार सैतान आहेत. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. गाव गाड्यात हा सैताना पुन्हा येता कामा नये. त्याने नवं सरकार उभं करता कामा नये हे आमचं मुख्य काम आहे. गावगड्याला आता लढाई लढावी लागणार आहे," असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. 


"80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. राजकारणाचा इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ 50 वर्ष या राज्यामध्ये राहिला," असंही यावेळी ते म्हणाले.


"पुण्यामधून काका मला वाचवा अशी हाक ऐकू महाराष्ट्राल ऐकू आली होती. पण आता एक नवी हाक सर्वांना ऐकू येत आहे, ती म्हणजे पुतण्यापासून मला वाचवा," असा टोला यावेळी त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी गवताचा भारा विस्कटला, आता गवताच्या कांडया तुटून पडतील असं भाकितही त्यांनी वर्तवलं