Maharashtra School Holidays Announced : आजपासून राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दक्ष झाले असून, आजपासून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी सुरु होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. तर विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची पूर्वतयारी करताना, सर्व शाळा 21 एप्रिलपासून 14 जूनपर्यंत बंद राहतील, असे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश विदर्भ वगळता सर्व जिल्ह्यांसाठी आहे.  


देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहरात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. त्यामुळे खबरदारी घेत सरकारने शाळांबाबत निर्णय घेतला आहे.


उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान,  हा आदेश केवळ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE शी संलग्न असलेल्या शाळांपुरता मर्यादित आहे. राज्यातील CBSE आणि इतर बोर्डांशी संलग्न असलेल्या शाळांना नसला तरी त्या या आदेशाप्रमाणे सुट्टी जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच CBSE आणि ICSE दोन्ही बोर्डांनी त्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.


दरम्यान, भारतीय हवामान विभागाने इशारा देताना म्हटले आहे की, उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान आधीच 45 अंशांच्या वर पोहोचले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील एका दुर्दैवी घटनेत तब्बल 14 जणांना प्राण गमवावे लागले.