Maharashtra Weather : राज्यावर अवकाळीसंकट अजूनही कायम आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain )  मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत तर हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे.  ( Unseasonal Rain News ) 


या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


 मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस


दरम्यान, काही जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यात मुंबईसह कोकण पट्ट्याचा समावेश आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम  स्वरुपाचा पाऊस होईल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.


काजू आणि आंबा बागायदारांपुढे संकट 


भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत 900 मीटरपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. तसेच राज्यात पुढच्या तीन दिवसात पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आहे. याचा  फटका उत्तर महाराष्ट्राला बसू शकतो. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागरमध्येही अवकाळीने हजेरी लावल्यामुळं काजू आणि आंबा बागायदारांपुढे संकट ओढावले आहे.