जळगाव : काश्मीरमधील (Kashmir) श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी (Srinagar Terror Attack) भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख (Yash Deshmukh) हे शहीद झालेत. प्रशिक्षण झाल्यानंतर गेल्या सात महिन्यापूर्वीच त्यांची पहिलीच पोस्टींग श्रीनगरला (Srinagar) झाली होती. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ला करुन पळ काढला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील जवान यश दिगंबर शहीद झालेत. काल दुपारी दोन वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते.


दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


यश देशमुख हे पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रीनगर येथे रूजू झाले होते. यश शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आईला धक्का बसला. त्या बेशुद्ध झाल्या. यश यांचे वडील शेतकरी असून, लहान भावाचे बारावीचे शिक्षण झाले आहे. यश हे अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळावू होते.  २८ तारखेला त्यांचे पार्थिव पिंपळगाव येथे आणले जाणार असल्याची माहिती आहे.