Maharastra Political News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप (Maharastra Politics) होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय. भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते सध्याच्या सरकारवर नाराज असल्याचा दावा केला जातोय. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सोबत घेऊन निवडणुकीत जास्त फायदा होणार नाही, असं भाजपला वाटतंय. शिंदेंचं बंड आणि सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंना अधिक सहानुभूती मिळत असल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदेंसारख्या मराठा नेत्याला सोबत घेतल्यास पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद कमी करता येईल, अशी आशा होती. मात्र, ठाणे आणि पालघर पलीकडे शिंदेंचा करिष्मा नसल्याचं स्पष्ट झालंय. वेदांता फॉक्सकॉनचं स्थलांतर, खारघर दुर्घटनेनंतर शिंदे एकाकी पडलेत. त्यातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं विरोधात दिल्यास एकनाथ शिंदेंच्या जागी कोण मुख्यमंत्री होऊ शकतो, याची चाचपणी भाजपनं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावरून विरोधकांनी काऊंटडाऊन सुरू केलंय.


तर दुसरीकडं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरूवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची राजकीय बैठक होणार असल्याचं समजतंय. महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर तिघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद कायम राहील. सत्ताबदल होणार नाही, असं स्पष्ट आश्वासन भाजपच्या वतीनं शिंदेंना यावेळी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर अजित पवारांबाबत देखील भाजप भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय. महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.


आणखी वाचा - Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्या? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!


मात्र, सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे, असं नाही. मुख्यमंत्री अचानक दोन दिवस सुट्टीवर गेल्यानं एकच गहजब उडाला. पोलीस बदल्यांवरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळं अमित शाहांच्या बैठकीत नेमकं काय होतंय, याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिंदेंना अभय मिळणार की राजकीय भूकंप होणार, याचा रिमोट कंट्रोल अमित शाहांच्या हाती असणारा आहे. अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. मात्र हे खरंय... धुवाँ निकला है, तो आग कही तो लगी होगी.