विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर हे आंदोलन पेटलं होतं. राज्यभरामध्ये या आंदोलनाचे लोण पेटलं आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. अशातच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही, अशी शपथ बीड (Beed) तालुक्यातील बेलवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना मारहाण केल्यानंतर बीड तालुक्यातील बेलवाडी गावच्या नागरिकांनी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रात भाजपाची सत्ता आहे, आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो आणि केंद्रात भाजपा सरकार आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाहीत अशी शपथच आता बेलवाडी येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.


जो पर्यंत माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत लोकसभेला भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे.


"आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या वरची मर्यादा आरक्षणाने ओलांडली आहे त्यामुळे जे काही आरक्षण आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी कायद्यात जो बदल करावा लागतो तो केंद्र सरकार करु शकते. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने हा बदल करुन आम्हाला आरक्षण देणे अपेक्षित आहे. भाजप सरकार कायद्यात बदल करुन आम्हाला आरक्षण देणार असेल तर आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत राहू. जर कायद्यात बदल करुन भाजप सरकार आरक्षण देणार नसेल तर यापुढे आम्ही त्यांना मराठा समाज म्हणून मतदान करणार नाही अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे," असे एका गावकऱ्याने म्हटलं आहे.


"2024 मध्ये लोकसभा निवडणूक येईल तेव्हा आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही. आमच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांना निश्चित मतदान करु. जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला वाटेल त्या पक्षाला मत देऊ पण भाजपला देणार नाही," असेही गावकऱ्यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी मराठा समाने यापूर्वी राज्यभर लाखोंच्या संख्येने आंदोलन केली आहेत. मात्र अद्यापपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. दोन दिवसांपूर्वी जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. आता मात्र मराठा समाज विविध प्रकारे सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत.