Marath vs OBC Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) राज्यव्यापी एल्गार सुरू केलाय. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) कडाडून विरोध केलाय. त्यामुळं राज्यात मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पेटलाय. जालन्यातल्या ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी जरांगेंवर वैयक्तिक हल्ला चढवला. तर टप्प्यात आल्यानंतर भुजबळांची वाजवणारच, असा पलटवार जरांगेंनी साताऱ्यातल्या सभेत केला. भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय... मराठा-ओबीसी (Maratha vs OBC) वाद पेटवून जातीय दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला. तर आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही, असा टोला भुजबळांनी लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केल्यानंतर आता मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं, अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतलीय. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळं हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जातेय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे नावाची त्सुनामी राज्यभरात दौरे करतेय. तर दुसरीकडं ओबीसी नेता म्हणून पुन्हा एकदा छगन भुजबळांनी आक्रमक रूप धारण केलंय. जरांगे विरुद्ध भुजबळ हा सामना भविष्यात काय वळण घेतो, याकडं सगळ्यांचं लक्ष असणाराय.


संभाजीराजे आणि भुजबळांमध्येही जोरदार जुंपलीय. भुजबळांची भाषा पाहता आपण त्यांना शाहू, फुलेंचे वारसदार म्हटल्याचा पश्चाताप होतो, असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय. तर राजे, आरक्षणात कशाला पडता, असा पलटवार भुजबळांनी केलाय. 


उदयनराजेंची सावध भूमिका
मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. अशातच खासदार उदयनराजे भोसलेंनी मराठा आरक्षणावर मोठं विधान केलंय. मेरिटवर आरक्षण द्या, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असं सांगत उदयनराजेंनी आरक्षणाबाबत सावध भूमिका घेतलीय. मनोज जरांगेंनी शुक्रवारी शाहू महाराज आणि संभाजीराजेंची भेट घेतल्यानंतर आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची भेट घेत चर्चा केली. यावेळी उदयनराजेंनी मनोज जरांगेंचं जंगी स्वागत केलं. इतकच नाही तर त्यांना कानमंत्रही दिला.


भुजबळांवर गंभीर आरोप
मनोज जरांगे विरूद्ध छगन भुजबळ हा वाद पेटलेला असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. भुजबळांनी सांताक्रूझमधील बंगला हडपला असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. हा बंगला फर्नाडिंस कुटुंबीयांचा असून रहेजा बिल्डरनं बंगला आणि जागा डेव्हलपमेंटसाठी घेतली मात्र नंतर परस्पर ही जागा परवेज कन्स्ट्रक्शन समीर भुजबळ यांना देण्यात आली असा आरोप दमानियांनी केलाय. तर दुसरीकडे आपण कुणाचंही घर हडपलेलं नाही असं सांगत भुजबळांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले आहेत.