Mumbai Goa Highway: तब्बल 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. गौरी-गणपतीला आणि होळीला मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात. मात्र रखडलेल्या महामार्गामुळं प्रवास करणे कठिण होते. तसंच, वाहतुककोंडीचा सामनाही करावा लागतो. मात्र, यंदा हा त्रास वाचण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गाकडे जाणारा दुसरा रस्ता आणि पुढे गोव्याकडे जाणाऱ्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळं कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता उपलब्ध होणार आहे. 


कोकणासाठी महत्त्वाचा मार्ग


ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मुंबईला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सागरी किनाऱ्यांवरील शहरांशी जोडतो. हा महामार्ग मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणाऱ्या NH 66 या मार्गाचा भाग असून पनवेलपासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजीमधून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो. 


उच्च न्यायालयाने खडसावले


गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. गेले दशकभर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? याची अंतिम तारीख न्यायालयाने सरकारला विचारली असता राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं आहे. 


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या इतर कामांसह इतर सर्व गोष्टीची कामं 31 डिसेंबर 2024च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 


गणपतीच्या आधी पूर्ण होणार का?


यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. त्यामुळं यंदा तरी चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.