मुंबई : Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर्षभरात सुरक्षित होण्याचे संकेत मिळत आहेत. अपघात टाळण्यासाठी आता  Mumbai-Pune Expresswayवर लवकरच अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याबाबत  एमएसआरडीसीकडून कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, मोठ्या अपघातानंतर प्रशासनाचे डोळे उघडळ्याची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने एक्स्प्रेस वेवर 'इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम' बसविण्यास एमएसआरडीसीला मुहूर्त सापडला आहे. यासंदर्भातील कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आलेत. एक्स्प्रेस वेवर 9 महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येईल. म्हणजे वर्षभरात अत्याधुनिक अशी आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित होईल. 


सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अंदाजे 160 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एक्स्प्रेस वेवर वाहतूक शिस्त पाळली जावी, अपघात टाळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच टोल वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे.