प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार :  धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हा दुष्काळाचा सामना करत आहे. यंदा खरीप हंगामात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न यथा तथाच आहे. त्यात आता चोरट्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील एका शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक किमतीचे कांदे चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेले आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पोलीस या कांदे चोराला जेव्हा पकडतील? आणि त्यात मुद्देमाल सापडेल का? हाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार तालुक्यातील आखतवाडे शिवारात शेतकरी महेंद्र पाटील यांनी आपल्या शेतात कांद्याची चाळ उभारून त्यात कांद्याची साठवणूक केली होती. अगोदरच दर नसल्याने त्यांनी चाळीतच कांदा साठवून ठेवणे पसंत केले होते. आता कांद्याचे भाव वाढल्याने, कांदे विक्रीच्या विचारात ते होते. कांद्याला प्रति किलो 50 ते 60 रुपये किलोचा दर मिळत असल्याने ते आनंदी होते. मात्र आता या कांद्यांवर चोरट्यांची वाईट नजर गेली आहे. महेंद्र पाटील यांच्या शेतातून जवळपास 223 कांद्यांची कट्टे चोरट्यांनी लांबवले आहेत. साडेपाच लाख रुपये किमतीचे कांदे चोरी झाल्याने एकच खळबळ उडाले. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहे.


शेतकरी आता गरजेप्रमाणे आपले कांदे विक्रीसाठी बाजारपेठेत काढत आहे. कांदे विक्री करण्यासाठी शेतकरी कट्टे भरून विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. मात्र चोरट्यांची नजर शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या या शेतमालावरत आहे. नंदुरबार तालुक्यात झालेल्या चोरीमुळे शेतकरी हवालदार झालेले आहेत. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र पोलीस निवडणुका आणि बंदोबस्तामध्येच बेजार झाल्याचे चित्रही आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा चोरट्यांचा शोध घेण्यासाठी किती वेळ देऊ शकेल? हा ही मोठा प्रश्न आहे.


दरम्यान, अशाही या बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी अजून नागवला जाणार नाही, याची काळजी सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. येणारा काळ अजून बिकट राहणार आहे. कारण जशा दुष्काळाच्या झळा वाढत जातील तसं तसं चोरीमारीच्या घटना वाढणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्या दृष्टिकोनातूनही उपायोजना करणे गरजेचे आहे.