निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक :  21व्या शतकातही राज्यात लोक अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये (Nashik News) घडलेल्या अशाच काहीशा प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. भोंदू बाबाच्या अघोरी विद्येतून नाशिकच्या (Nashik Crime) सटाण्यात (satana) एका आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण दोन दिवसांपासून गायब होता. त्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह भोंदुबाबाच्या घरात सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांत (Nashik Police) तक्रार करत भोंदुबाबाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात सीमेवरील आलीयाबाद येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रविण गुलचंद सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून तो पिंपळकोठे गावचा रहिवाशी आहे. प्रविणची तब्बेत ठीक नसल्याने तो आलीयाबाद येथील  तुळशीराम सोनवणे या भोंदू बाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. तर भोंदूबाबाचेही मृत प्रविणच्या घरी येणे जाणे होते. आठवडाभरापुर्वी मृत प्रविण सोनवणे हा भोंदू बाबाकडे उपचारासाठी गेला होता. मृताचे कुटुंबीय मुलगा घरी आला नाही म्हणून भोंदू बाबाला फोन करुन विचारणा करत होते, मात्र बाबा त्यांना उडवा उडवीची उत्तरे देत होता.


अखेर जायखेडा पोलिसांच्या मदतीने तपास केला असता बाबाच्या घरातच प्रविण याचा मृदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. भोंदु बाबनेच प्रविणची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थानी केला आहे. दरम्यान तुळशीराम बुधा सोनवणे हा भोंदू बाबा मात्र आपल्या एका साथीदारासह फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान या भोंदू बाबावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.


"आलीयाबाद गावातील भोंदुबाबा तुळशीराम सोनावणे आमच्या घरी आला होता आणि माझा भाऊ प्रविण सोनवणे याला सोबत घेऊन गेला होता. दुसऱ्या दिवशी तुळशीरामला फोन केला असता त्याने उडावउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दोन तीन दिवस तुळशीराम सोनावणे तुझा आमच्यासोबतच आहे असेच सांगून टाळत होता. त्यानंतर शनिवारी गावच्या पोलीस पाटलांनी त्या भोंदुबाबाच्या घरी प्रविणचा मृतदेह पडल्याचे सांगितले. भोंदुबाबा भावाचा नरबळीसारखा प्रकार करुन फरार झाला आहे. त्याला अजूनही शिक्षा झालेली नसून शासनाने त्याला शिक्षा करावी अशी आमची विनंती आहे," असे मृत प्रविणचा भाऊ सोनवणे यांनी म्हटले आहे.


"दोन तीन दिवसांपूर्वी आमच्या पिंपळकोठे गावात अघोरी विद्येच्या नावाखाली एका तरुणाचा बळी गेला आहे. आजही लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात ही शोकांतिका आहे. त्यामुळे अशा भोंदुगिरीकडे न जाता डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत. हा नरबळीचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार घडत आहेत. समाजाने अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये तसेच अशी भोंदुगिरी करणाऱ्यांचे अड्डे उद्धस्त करावेत," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.