अहमदनगर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच भोवळ आली. ते याठिकाणी राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. चक्कर आल्यानंतर गडकरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यानंतर नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. 
 
 यावेळी त्यांनी आपल्याला चक्कर का आली, याचेही कारण सांगितले. जिथे कार्यक्रम झाला ते सभागृह बंदिस्त होते. त्यामुळे मला गुदमरायला झाले. याशिवाय, दीक्षांत सोहळ्यासाठी मला गाऊन परिधान करावा लागला. त्यामुळे ऑक्सिजन कमी मिळाला. परिणामी मला चक्कर आली. मात्र, आता माझी प्रकृती ठीक आहे. ब्लडप्रेशर किंवा शुगरचा कोणताही त्रास मला होत नाहीये, असेही गडकरींनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या हितचिंतकांचेही आभार मानले.
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी हे आज हेलिकॉप्टरने शिर्डीत आले. तिथून ते राहुरीतील कार्यक्रमात गेले. तिथे जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले. यानंतर कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. सुदैवाने यावेळी राज्यपाल विद्यासागर राव गडकरींच्या बाजूला उभे होते. गडकरींना चक्कर येत असल्याचे बघून विद्यासागर राव यांनी लगेचच त्यांना सावरले.