Warrant against Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केलं आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. यापूर्वीदेखील काही वर्षांपूर्वी याच प्रकरणी ते निलंगा न्यायालयात हजर झाले होते. 16 वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. 


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी  2008 मध्ये  उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर राहावे लागले होते. वकिलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केलं आहे. 


या प्रकरणात चार जणांना रितसर वकिलामार्फत जामीन मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळुंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा 16  वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे.