हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे: महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. 150 वर्षापासूनची ही परंपरा आपलं वेगळेपण जपणारी आहे. ही यात्रा पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी उत्सव प्रत्येक वर्षी पौष शुक्ल प्रतिपदा या दिवशी सुरूवात होते. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या या यात्रेत हजारो भाविकांना दोन दिवस आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी गावच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून बाजरीच्या भाकरी जमा केल्या जातात. (on the occasion of the death anniversary of Shri Rangdas Swami of Ane devotees tastes amti and bhakari in Junnar taluka of Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावातील घराघरातून आलेल्या बाजरीच्या भाकरींची पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूकही काढली जाते. आणे गावच्या पंचक्रोशीतून अशाप्रक्रारे वाजत-गाजत टेंपो, ट्रक, जीप अशा जमेल त्या वाहनातून बाजरीच्या भाकरी गावात आणल्या जातात. प्रत्येक घराने दीड शेराच्या भाकऱ्या द्यायच्याच हा नियम गेली दीडशे वर्षे काटेकोरपणे जपला जातो. त्यामुळे जमा होणाऱ्या या बाजरीच्या भाकरीनी अक्षरश: एक खोली भरून जाते.


काय आहे परंपरा? 


एकीकडे  भाकरींच्या चवडी (थप्पी) वाढत असतात तर दुसरीकडे या भाकरीसाठी (Bhakari and Amti Recipe) आमटी बनवणं सुरु असतं. भल्या मोठ्या लोखंडी कढयांमध्ये ही आमटी बनविली जाते. ही चविष्ट आमटी तयार करण्यासाठी तुरडाळ, गुळ, खोबरे, मीठ, मिरे, लवंग, शेंगदाणे, बेसनपीठ, पापडखार, हळद, मिरची, जिरे, शहाजिरे, आमसुल, जायपत्री, धने, तेल, हिंग, कर्णफुल आदी 21 प्रकारचे मसाले व वस्तू लागतात. या सगळ्याचा फक्त आमटी बनवण्याच्या मसाल्यांचा यंदाचा खर्च 8 झाला आहे. 


श्री रंगदास स्वामींच्या मंदिरात दुपारी 12 वाजता आरतीला सुरुवात झाली. आरतीनंतर स्वामींना आमटी आणि भाकरीचा नैवैद्य दाखवला आणि नंतर पंगतींना सुरुवात झाली. लहान-मोठे असा भेद विसरून एरवी जपल्या जाणाऱ्या आपाआपल्या ओळखी विसरून सारेजण एकत्र पंगतीला बसतात. सर्वांसाठी प्रसादही एकच असतो. वाढण्याचं काम शाळा कॉलेजची मुलं-मुली करतात. या ठिकाणच्या आमटी आणि भाकरीची चव दूसरीकडं कुठचं मिळत नाही. आमटीसाठी लागणारं साहित्याचा खर्च परिसरातील दानशुर अन्नदाते करतात. आमटीचा खर्च करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ असते. पुढील 2032 पर्यंतच्या आमटीच्या प्रसादाचा देनगीदार आजच बुक आहेत.