मुंबई / बीड : Pankaja Munde News : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) या अधिक आक्रमक झाल्या आहेत. बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन पंकजा या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना एक घोषणाच करुन टाकली. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही, असा त्यांनी पण केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी गोपीनाथ गडावरून सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांनी झेंडा दाखवल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी 'पंकजा मुंडे अंगार हैं, बाकी सब भंगार हैं', अशा घोषणा दिल्या. ही बाब पंकजा मुंडे यांच्या लक्षात आल्यावर त्या चांगल्याच संतापल्या. अशा घोषणा कशासाठी देता, हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? या घोषणांनी आपलीच बदनामी होते, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.


दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागत नाही तोपर्यंत हारतुरे घेणार नाही आणि फेटा ही बांधणार नाही, असा संकल्प भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मार्गी लागत नाही तोपर्तंय गळ्यात हार नको. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत मला कोणी फेटा बांधायचा नाही, असा निर्धार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. त्याचवेळी त्या म्हणाल्या, 'बीडमध्ये एक चांगले आणि सुंदर उदाहरण घालून देऊ आरक्षण लढा वेगळ्या मार्गाने उभा करूया.' 


यावेळी त्यांनी राजकारणावर भाष्य केले. राजकारण कसे असावे, याचे उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. ज्याला खुर्चीवर बसायचे आहे, त्याला आपण आपआपसात भांडून मरावे असे वाटते, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी असे केले नाही. त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केले. गोपीनाथ मुंडे यांना मी एकदा विचारले होते तेव्हा त्यांनी शिवाजी महाराज यांचे नाव समोर ठेऊन राजकारण करत असल्याचे सांगितले.