Moral responsibility of parents : पुणे कार अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या (Pune Porsche Accident) आरोपी मुलाचे शाळेतले मुजोर कारनामे आता समोर आलेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी (Sonali Tanpure) अग्रवालांच्या मुलावर गंभीर आरोप केलेत. कारखाली दोघांना चिरडणाऱ्या मुलामुळेच तनपुरेंच्या मुलालाही शाळा सोडावी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणीनगर येथील कार अॅक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असं सोनाली तनपुरे यांनी म्हटलंय.


पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची? 


शाळेतच या अल्पवयीन मुलाची गुंड प्रवृत्ती ठेचून काढली असती तर तो आणखी मुजोर झाला नसता. मुलांना शिस्त लावणं हे पालकांवर असतं. मात्र या मुजोर मुलाच्या बड्या बापानं आपल्या पोराला खुली छूट दिली होती. पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची? असा प्रश्न सध्या विचारला जातोय.


मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी शाळा आणि पालकांची आहे. समाजामध्ये कसं वागायला हवं हे पालकांनी मुलांना शिकवायला हवं, असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांनी म्हटलं आहे. मुलांना जबाबदार नागरिक बनवणं शाळा आणि पालकांचं दायित्व आहे. मुलांवरील चांगले संस्कार देण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे, असंही डॉ.राजेंद्र बर्वे म्हणतात. वाढत्या वयानुसार मुलांना नैतिक मुल्यांची शिकवणं देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांच्या वर्तनातील बदलाकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे, असा सल्ला देखील डॉ.राजेंद्र बर्वे यांनी दिलाय.


दरम्यान, मुलांना वेळीच शिस्त लावली पाहिजे. चूक केल्यास समज दिली पाहिजे. मात्र पालकच मुलाच्या चुका पाठीशी घालत असतील तर काय होतं हे पुण्यात दिसलं. पुण्यातल्या अल्पवयीन आरोपीच्या बापाने मुलाच्या हाती महागडी कार दिली. दारु ढोसायला मोकळीक दिली आणि याच मुलाने दारुच्या नशेत बेदरकार कार चालवत दोघा निष्पापांचा बळी घेतला.