Thane News : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात राडा पाहायला मिळाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला चोप देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी यांना चोप दिला आहे. शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर आणि त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी गिरीश कोळी यांना जोरदार मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याआधीही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. परंतु शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.




दरम्यान, मुख्यमंत्री यांच्याबाबत लिहिलेली पोस्ट डिलीट करण्यात आलेली आहे. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आव्हाड म्हणाले की, हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड. मग पोलीस छळणार.. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार… जेलमध्ये सडवणार.. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे. आणि मागचे 35 दिवस तर सगळ्या मर्यादा पार झाल्या असल्याचे मत आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.