मुंबई : शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट हमीभाव आणि दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी  29 जूनला पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दुसऱ्या विधेयकात दुधासह भाजीपाल्याला  हमी भाव मिळण्यासाठी लोकसभेत कायदा हवा यासाठी 23 राजकीय पक्षांना आणि 192 संघटनांना बरोबर घेऊन बिल बनवले, पावसाळी अधिवेशनात सरकारने हे बिल मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.


सात-बारा कोरा नाहीच 


शेतकरी कर्ज माफी योजना पूर्णपणे फेल गेली असून, संपूर्ण कर्ज माफी केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा संपणार नसल्याचा इशारा, खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आर्थिक अडचणीतील शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, वर्षपूर्तीच्या कालावधीत अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. उलट या वर्षभरात २३० शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळल्याकडे, राजू शेट्टींनी लक्ष वेधलं.