कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतक-यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी चौतिसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत केली आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन शेतक-यांना संपूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी. त्याचबरोबर उत्पादन खर्चाचा दीडपट हमी भाव मिळावा. वारंवार आदेश देऊनही एफआरपी दिलेली नाही अशा साखर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या सर्व साखर कारखान्यांच्या गेट आणि गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. तसंच सर्व साखर कारखान्यांची गोडाऊन आणि वजन काटे ऑनलाईन करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 


राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी कर्जस्वरुपातली उचल 90 टक्के द्यावी अशी मागणीही केली गेली. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आणि राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोतांची स्वाभिमानी संघटनेतून हाकालपट्टी केल्याच्या पार्श्वभूमीवर ही ऊस परिषद झाली.