NCP Rohit Patil Exclusive Interview: लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघाची सर्वात जास्त होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही हा मतदारसंघ चर्चेत येऊ शकतो. कारण माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात. शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याची लवकरच अधिकृत घोषणादेखील होऊ शकते.दरम्यान झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी रोहित पाटील यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. दरम्यान अजित पवारांकडून तुम्हाला ऑफर आली होती का? तुम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांनी कमावलं होतं ते कमावयचं आहे. ते गमावताना बघितलं आहे त्यामुळे ते गमवण्याची भूक जास्त आहे," असं म्हटलं असून संघर्ष अटळ असल्याची जाणीव आपल्याला असल्याचं रोहित पाटील म्हणाले. तुम्ही आमदारकी लढवणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. गेली अनेक वर्षे मी काम करतोय. आई आमदार असताना तिचा भार कमी व्हावा म्हणून मी कामाला सुरुवात केली.त्यातून समाजसेवेची आवड निर्माण झाली. त्यावेळी लोक काय म्हणतील त्यावर निर्णय घेणार असे उत्तर त्यांनी दिले. लोक मतदानावेळी ठरवतील पण आता रोहित पाटलांना काय वाटतं? असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावेळी नक्कीच.काम करतोय आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक असते असं नक्की वाटतं. असे ते म्हणाले. येत्या विधानसभेला रोहितने लढावं अशी त्यांची इच्छा आहे. घरच्यांनीही मोठ पाठबळ दिलं, असेही ते म्हणाले.


सुरुवात केली तेव्हा मी लोकांच्या पाया पडतो म्हणून माझ्यावर टीका झाली. पण लोकांसमोर जाताना हनुवटी खाली ठेवावी असे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे आता मी टीकेवर लक्ष देत नाही. आपली रेष मोठी करायची असल्याचे ते म्हणाले. मी राजकारणात आल्यापासून आम्ही विरोधातच आहोत. मी नेहमी लोकांचे प्रश्न मांडत आलोय. शासनविरोधी भूमिका मांडत असतो. सत्तेत असतो तर कदाचित जोराने भूमिका मांडता आली नसती, असे रोहित पाटील म्हणाले.


'त्या' दिवशी काय झालं?


2 जुलै संध्याकाळी शपथविधी झाला. आम्ही सर्व एकत्र बसलो होता. आमच्यात आजीने निर्णय घेतला. शरद पवारांना सोडून काही निर्णय घ्यायचा नाही, असे आजीने सांगितले. दुसऱ्या दिवशी शरद पवार कराडला येणार होते. शरद पवार आबांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहेत. अशावेळी शरद पवारांविषयी कृतज्ञ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे रोहित पाटील म्हणाले.


अजित पवारांकडून विचारणा झाली?


विचारण सर्वांनाच झाली असावी. आम्हालाही झाली. पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली. आई आणि मला दोघांनाही विचारणा झाली. मतदार संघात कामे दिली जात नाही. राजकारण या दृष्टीने मला योग्य वाटत नाही. आबांनी विरोधी पक्षासोबतही सलोख्याचे संबंध जपले होते. माझ्या मतदार संघातील लोकं ही महाराष्ट्रातीलच आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला मतदान केलंय. त्यांची कामे व्हायला हवीत. आम्ही रस्त्याची मागणी करतोय. त्या रस्त्यावरुन लाखो लोकं जाणार आहेत. त्यासाठी आम्ही निधी मागतोय. निधीसाठी आम्ही गेलो पण निधी दिला गेला नाही, अशी खंत रोहित पाटलांनी बोलून दाखवली.अजित पवारांसोबत आजही संबंध चांगले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना मी भरपूर निधी आणला होता. आता 60 महिने निधी आला नाही तरी हरकत नाही. येणारं सरकार आपलं आहे, हा विश्वास मी कार्यकर्त्यांना दिलाय, असे त्यांनी सांगितले.


नेतृत्व कोणाकडे जायला हवं?


सुप्रिया सुळेंकडे की अजित पवारांकडे नेतृत्व जायला हवं होतं? एक तरुण नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देताना, माझी सर्व कामे शरद पवार साहेबांकडे जाऊन होत होती. नेतृत्व कोणाकडे असायला हवे? यावर कधी मी विचार केला नाही, असे उत्तर त्यांनी दिले.


संपूर्ण मुलाखत कधी पाहता येईल?


रोहित पाटील यांची ही संपूर्ण विशेष मुलाखत आज (शनिवार, 20 जुलै 2024) रात्री 9 वाजता आणि उद्या म्हणजेच रविवार, 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता 'झी 24 तास'वर पाहता येईल.