लातूर: किल्लारी भूकंपाच्यावेळी लोकांनी दाखविलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मला कॅन्सरशी लढण्याचे बळ मिळाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. लातूरमध्ये १९९३ ला झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या घटनेला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. शरद पवार यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून तातडीने केलेल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामामुळे त्या संकटाच्या काळातही जगण्यासाठी मोठा आधार स्थानिकांना मिळाला होता. या निमित्ताने शरद पवार यांच्या प्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी विशेष कार्यक्रम भूकंपग्रस्तांनी आयोजित केला होता. 


यावेळी पवारांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले की, भूकंपग्रस्तांनी नातेवाईक मयत झाले असतानाही पुन्हा उभे राहण्याचे धैर्य दाखवले. त्यावरुन मलाही कॅन्सरशी लढण्याचे बळ मिळाले. उमरगा तालुक्यातील बलसुर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ पदमसिंह पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.