मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्रात आता या संसर्गाचा धोका दिवसागणिक वाढतच चालला आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या फरकाने वाढल्याचं पाहायला मिळालं. दिवसभरात राज्यात तब्बल २९४० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होण्याचा हा आतापर्यंतचा मोठा आकडा ठरत असल्यामुळे सर्वत्र भीती आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्या खात्यापुढे मोठी आव्हानं उभी करत आहे. दिवसभरात मुंबईत १७५१ नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाचा विळखा राज्यात आणि राजधानी मुंबईत परिस्थिती कठिण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, सर्वाधिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४४,५८२ वर पोहोचला आहे. शुक्रवारी रुग्णसंख्यावाढीसोबतच राज्यात कोरोनामुळे ६३ मृत्यूंचीही नोंद झाली. यापैकी ४६ म्हणजेच जवळपास ४६ % जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा प्रकारचे अतिजोखमीचे आजार आढळल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १५१७ इतकी झाली आहे. 


 


एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच या विषाणूवर मात करत घरी परतणाऱे रुग्ण या प्रसंगी दिलासा देत आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी जवळपास १२,५८३ रुग्ण बरे झाले असल्याचं वृत्त आहे. तर, ४,६९,२७५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर, २८,४३० जणं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.