Kolhapur Voilence: कोल्हापुरात हिंदुत्त्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्या. आता कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कायदा हातात घेऊ नका, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 


कोल्हापूर बंदला हिंसक वळण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. औरंगजेबाचं स्टेटस लावल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करत हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.  कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.


चुकीच्या गोष्टींना धार्मिकतेचे रंग - पवार


चुकीच्या गोष्टींना प्रतिक्रिया म्हणून धार्मिक रंग देणे योग्य नाही, मात्र सध्याचे सत्ताधारीच अशा गोष्टींना प्रोत्साहीत करत आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. अशा वादात राज्यकर्तेच उतरायला लागले तर ते योग्य लक्षण नाही असं पवारांनी म्हटले आहे. 


औरंगजेब, टिपू सुलतानच्या उदात्तीकरणावरून आता राजकीय वाद पेटलाय. अशा चुकीच्या गोष्टींना धार्मिक रंग देण्यास सत्ताधाऱ्यांचंच प्रोत्साहन आहे, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला. त्यावर विरोधकांकडूनच अशा गोष्टींना फूस दिली जात असल्याचा पलटवार फडणवीसांनी केला.  


संजय राऊत यांचा सरकावर गंभीर आरोप


औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, त्यांना पाकिस्तानात हाकलून द्या, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.  


'औरंगजेबची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच' 


अचानक राज्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं सुरु झाले, याला फूस लावणारे कोण आहेत याची चौकशी केली जात आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण हा योगायोग नाही, याच्या खोलात जावं लागेल असं फडणवीस म्हणाले. 



कोल्हापूरमधील घडामोडींची गंभीर दखल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. औरंगजेबची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच असं फडणवीसांनी ठणकावले आहे. दोषींवर कठोर कारवाई करा तसेच कोल्हापूरमधली परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणा अशा सूचनाही फडणवीसानी  दिल्या आहेत. जनतेनेसुद्धा शांतता पाळावी आणि कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळवी घ्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.